नेहमीप्रमाणे तो संध्याकाळची वाट बघत होता .
संध्याकाळ होताच तो लगबगीने उठला . झोपडीच्या खुंटीवर टांगलेला फेटा डोक्यावर चढवला . चुली शेजारच्या दोन भाकऱ्या ,कांदा ,मिरची त्याने फडक्यात बांधून घेतली . घोंगडी खांद्यावर टाकली . झोपडीच्या दरवाज्याच्या पाठीमागून काठी आणि कुऱ्हाड सोबत घेतली.काठीच्या टोकाला शिदोरी बांधली . तुटलेल्या पायताणाचा अंगठा निट करत त्याने झोपडीबाहेर जंगलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली .
संध्याकाळ होताच तो लगबगीने उठला . झोपडीच्या खुंटीवर टांगलेला फेटा डोक्यावर चढवला . चुली शेजारच्या दोन भाकऱ्या ,कांदा ,मिरची त्याने फडक्यात बांधून घेतली . घोंगडी खांद्यावर टाकली . झोपडीच्या दरवाज्याच्या पाठीमागून काठी आणि कुऱ्हाड सोबत घेतली.काठीच्या टोकाला शिदोरी बांधली . तुटलेल्या पायताणाचा अंगठा निट करत त्याने झोपडीबाहेर जंगलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली .
साधारण सहा फुटांच्या आत-बाहेरची उंची, सावळा रंग, पिळदार शरीरयष्टी, अंगा-खांद्यांवर खोलवर झालेल्या जखमांचे व्रण, अंगात बंडी , कमरेला मळकं आणि ठिकठिकाणी रफू केलेला धोतर ,उजव्या हातात आणि पायात पितळेच कडं, गळ्यामध्ये कसला तरी तावीज, डोक्यावर फेटा , कमरेला कट्यार बांधलेली , वाढलेली दाढी आणि डोळ्यात चमक … एखाद्या भयावह रानटी माणसासारखी त्याची ती प्रकृती त्या अंधारमय वेळी जास्तच भेदक वाटत होती .
कुणास ठावूक तसा तो किती वेळ चालत होता. मध्यरात्र झाली होती. चंद्राच्या अंधुक प्रकाशात कसातरी मार्ग काढत तो जंगलाच्या मध्यवर्ती भागात येउन पोहोचला. त्या जंगलाच्या आजूबाजूस बहुधा बरीच छोटी गावे होती . तो तेथेच थबकला. इथून पुढे त्याला कोण्याही एका दिशेला जाणे भाग होते. त्याने शिदोरी काठीवरून उतरून शेजारच्या झाडाच्या बाहेर आलेल्या बुध्याला टांगली . आणि तिथे असलेल्या एका दगडावर त्याने आपले प्रस्थान मांडले. जंगलातल्या निशाचर प्राण्यांचा आवाज त्याला नवीन नव्हता . त्यामुळेच कि काय भय त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते . पण त्याचा चेहरा मात्र विषण्ण होता . तशी ती जागाही त्याला नवीन नव्हती . थोडावेळ बसून तो उठला त्या झाडाच्या पाठीमागे असणाऱ्या जलाशयाकडे तो निघाला होता . ओंजळ भरून पाणी पिल्यावर त्याने निश्वास टाकला . त्या जलाशयाच्या बाजूला तो कितीतरी वेळ पाण्यात दगड मारत उभा होता. त्याने फेकलेले दगड पाण्यावर पाच सहा टप्पे खात दूरवर जाउन पडत . त्याच्या त्या कृतीमुळे चंद्राची जलाशयावरची छाया मोडत असे. हि बालक्रीडा त्याच्या प्रकृतीला शोभणारी नव्हती पण त्या वेळेस तिथे त्याला बघणारा कुणीही नव्हता म्हणून कि काय तो निश्चिंत होता . असाच थोडावेळ गेल्यावर तो पुन्हा शिदोरी जवळ आला आणि तेवढ्यात आधीच टपून बसलेल्या दोन जंगली कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला .
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो बिथरला नाही …कदाचित भीती हि त्याच्या शब्दकोशातच नव्हती . कसाबसा त्याने फेटा आपल्या हाताला गुंडाळला आणि तो हात चावण्यासाठी अंगावर आलेल्या एका कुत्र्याच्या जबड्यात दिला . दुसऱ्या हाताने तो काठी घ्यायच्या प्रयत्नातच होता कि क्षणार्धात दुसऱ्या कुत्र्याने त्यावर हल्ला केला . यावेळेस मात्र त्याला स्वताचा बचाव करता आला नाही . त्या जंगली श्वापदाचे दात त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर रुतले . तो कासावीस झाला . रक्ताने त्याचा डावा हात लाल होत चालला होता . कसाबसा त्याने दुसऱ्या हातातल्या कुत्र्याला झिडकारले. तो कुत्रा त्यामुळे दूर जाउन पडला . कमरेची कट्यार काढून त्याने चावणाऱ्या कुत्र्यावर उगारली आणि दोन्ही हाताने त्या कुत्र्याचा प्रतिकार करत त्याला आपल्या शरीरापासून त्याने दूर केले . एवढ्या अवधीत त्याने काठी मिळवली आणि आता पूर्ण प्रतिकार करण्यास तो समर्थ झाला . काठीच्या मदतीने त्याने त्या दोन्ही जंगली श्वापदांना दूर जंगलात पळून जाण्यास भाग पाडले . त्या शर्थीच्या झुंजीत त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर खोल जखम झाली . कदाचित इतर जखमा अश्याच चकमकीच्या असाव्यात . कुठला तरी झाडपाला त्याने जखमांवर लावून त्यावर धोतराचा तुकडा फाडून लावला . त्यामुळे रक्त थांबले होते पण वेदना तर असह्य होत्या . वेदनांना आवर घालत त्याने शिदोरी संपवली आणि पाणी पिउन तो एका गावाच्या दिशेने चालायला लागला .
जंगलाच्या टोकाला एका गावाच्या वेशी जवळ तो येउन पोहोचला . ते एक गाव नुकतेच एका प्रेताला तिलांजली देऊन गेले होते . गावाच्या विरुद्ध दिशेला जंगलाच्या बाजुला असणार्या स्मशानातून तिलांजलीचा धूर अजूनही निघत होता . बहुधा फार वेळ झाला नसावा गावकरी जाउन. एक नजर त्याने गावच्या वेशीकडून फिरवून कुणीही बघत नसल्याची खात्री करून घेतली आणि पुढे तो त्या स्मशानभूमीकडे चालायला लागला . त्या स्मशानवत शांततेला त्याच्या चालण्याचा आणि जंगली श्वापदांचा आवाज भंग करत होता .
अंधाऱ्या रात्री अजूनही चितेवरचे काही निखारे लखलखत होते . सर्व लाकडे जळून राख फक्त उरली होती .त्या चितेपाशी काही वेळ घुटमळल्या नंतर त्याने पुन्हा एकदा कोणी पाहत नसल्याची खात्री केली . मनात विचारांनी गर्दी केली होती . मुळातच निडर असणाऱ्या स्वभावाला स्वतःच्याच कृत्याची भीती वाटती होती . पण त्याच्यासाठी हि पहिली वेळ नव्हती आणि कदाचित शेवटचीही नसणार . हि विचारांची लढाई त्या जंगली श्वापदांपेक्षा हि क्रूर होती . मनात उठणाऱ्या वावटळाकडे त्याने दुर्लक्ष केले आणि जवळच्या काठीने त्याने राखेतून त्या प्रेताची हाडे बाहेर काढण्यास सुरुवात केली . मुळातच जखमी असलेला हात आता जास्तच थरथर कापत होता .
जवळच्या कुऱ्हाडीने त्याने ती हाडे फोडण्यास सुरुवात किली . त्याची नजर राखेत असणाऱ्या चमकदार छोट्या कणांना शोधत होती . तेवढ्यात गावाच्या वेशीवरून लोकांचा आवाज , कल्लोळ ऐकू येवू लागला . काही लोक मशाली , काठ्या घेऊन त्याच्याकडे वेगाने येत होती . आणि काही वेळातच त्यांनी त्याला गाठलचं . थोड्या वेळातच तो पूर्णपणे घेरला गेला होता .
काही दिवसांपासूनच त्या पंचक्रोशीत स्मशानभूमीत उकरलेल्या अस्थींच्या घटना होत होत्या . प्रेतावर असणार सोनं प्रेताला जाळल्यावर उरल्या - सुरल्या हाडांत जाउन बसतं . कुणीतरी त्या सोन्याच्या मोहापायी हे कृत्य करत होतं हि गोष्ट कळायला त्या पंचक्रोशीला जास्त वेळ नव्हता लागला . त्यामुळे आज पाळत ठेवून गावकऱ्यांनी त्याला घेरला होता.अर्धमेला झाल्यावर गावकऱ्यांनी त्याला जंगलात फेकून दिले . काही वेळाने तो शुद्धीवर आला . मारामुळे होणाऱ्या असह्य वेदनांनी तो तळमळत होता . तसाच फरपडत तो घराकडे निघाला. दोन दिवस घरात तसाच पडून राहिला…
सूर्य क्षितिजाच्या पार लालसर दिसत होता ,जंगलात दूरवर रानटी कुत्र्यांचा आवाज घुमत होता, पक्षी आपल्या घराकडे परतत होते , वटवाघुळे पिंपळाच्या झाडाला घिरट्या घालत होते आणि पुन्हा एकदा तो संध्याकाळची वाट बघत होता .…
जवळच्या कुऱ्हाडीने त्याने ती हाडे फोडण्यास सुरुवात किली . त्याची नजर राखेत असणाऱ्या चमकदार छोट्या कणांना शोधत होती . तेवढ्यात गावाच्या वेशीवरून लोकांचा आवाज , कल्लोळ ऐकू येवू लागला . काही लोक मशाली , काठ्या घेऊन त्याच्याकडे वेगाने येत होती . आणि काही वेळातच त्यांनी त्याला गाठलचं . थोड्या वेळातच तो पूर्णपणे घेरला गेला होता .
काही दिवसांपासूनच त्या पंचक्रोशीत स्मशानभूमीत उकरलेल्या अस्थींच्या घटना होत होत्या . प्रेतावर असणार सोनं प्रेताला जाळल्यावर उरल्या - सुरल्या हाडांत जाउन बसतं . कुणीतरी त्या सोन्याच्या मोहापायी हे कृत्य करत होतं हि गोष्ट कळायला त्या पंचक्रोशीला जास्त वेळ नव्हता लागला . त्यामुळे आज पाळत ठेवून गावकऱ्यांनी त्याला घेरला होता.अर्धमेला झाल्यावर गावकऱ्यांनी त्याला जंगलात फेकून दिले . काही वेळाने तो शुद्धीवर आला . मारामुळे होणाऱ्या असह्य वेदनांनी तो तळमळत होता . तसाच फरपडत तो घराकडे निघाला. दोन दिवस घरात तसाच पडून राहिला…
सूर्य क्षितिजाच्या पार लालसर दिसत होता ,जंगलात दूरवर रानटी कुत्र्यांचा आवाज घुमत होता, पक्षी आपल्या घराकडे परतत होते , वटवाघुळे पिंपळाच्या झाडाला घिरट्या घालत होते आणि पुन्हा एकदा तो संध्याकाळची वाट बघत होता .…